Tuesday 19 April 2011

कुणीतरी कुठेतरी......................

ऐलतीरी वा पैलतीरी,  जीवनाच्या या वाटेवरी
असेल काहो माझ्यासाठी, कुणीतरी कुठेतरी ...

काळा तिळ ओठावरी, कांती तीची गोरी गोरी
असेल काहो ती माझ्या, स्वप्नातली जणू परी...

गाल तिचे लाल लाल, हरणीसारखी तीची चाल
काळ्याभोर केसांमध्ये, गुलाबाचे फुल छान.....

कोकीळेचा कंठ तीचा, सरस्वती वसे तीच्या वाणी
नाजूकश्या त्या कोमल हातांनी पाजेल का हो मला ती पाणी...

प्रेमळ वात्सल्याची मुर्ती, दूरवर असे जीची किर्ती
भेटेल का कधीतरी अशी कुणी करण्या माझ्या स्वप्नांची पूर्ती...

प्रेमाचा वर्षाव सदा माझ्यावर करण्या
वेडा जीव माझ्यावरच लावण्या
भेटेल का हो अशी वेडी कुणी
जी बसेल माझ्या या वेड्या मनी...


ऐलतीरी वा पैलतीरी,  जीवनाच्या या वाटेवरी
असेल काहो माझ्यासाठी, कुणीतरी कुठेतरी ...

*** लिंगूराम शापित


Thursday 7 April 2011

पण उपेक्षीतच राहीलो..........


मनातले काही भाव येथे मांडण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न -


दाट धुक्यातून कसाबसा मी वाट काढीत चाललो
काय शोधू पाहे हे मन कळेणा अण् पुन्हा पुन्हा हरवलो

जीवन मरणाच्या या गाड्यात पुरता अडकू मी गेलो
कधी सुटणार हे पाश दुःखांचे खूप कासाविस मी झालो

वाट पाहून थकलो तरी नाही आले मरण
का जगतोस असे म्हणते माझे मन, आता पुरे झाले हे जीवन


नाही कोणी माझे येथे, जगणे एकटेच जगलो
       केली प्रेमाची अपेक्षा, पण उपेक्षीतच राहीलो...............


*** लिंगूराम शापित


Tuesday 5 April 2011

समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक

मी मनाला फार मानतो. कारण मनच माझ्यासाठी माता, पिता, गुरु, ईश, बंधु, सखा आणि सर्व काही.....
मनाला नेहमी चांगल्या गोष्टींची आवड लागावी त्यासाठी समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक दिवसातून एकदातरी डोळ्याखालून घालावे, मनात म्हणावे, त्याचा मनावर चांगलाच परिणाम होतो. कारण मन किती चंचल असतं त्याचं सुरेख वर्णन बहिणाबाईंनी आपल्या कवितेतून व्यक्त केले आहे. मी आपल्या सर्वांसाठी समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक  वाचण्यासाठी देणार आहे.

मन किती चंचल असते त्याबद्दल बहिणाबाई वर्णन करतात  ------


मन वढाय वढाय

उभ्या पीकातलं ढोर
किती हाकला हाकला 
फिरी येतं पिकांवर

मन मोकाट मोकाट
याच्या ठाई ठाई वाटा
जशा वार्‍यानं चालल्या 
पान्यावर्‍हल्या रे लाटा

मन लहरी लहरी
त्याले हाती धरी कोण ?
उंडारलं उंडारलं
जसं वारा वहादनं

मन पाखरू पाखरू
याची काय सांगू मात ?
आता व्हतं भुईवर
   गेलं गेलं आभायात....

ह्या अशा मनाला काबूत ठेवण्यासाठी सगळ्यांनी मनाचे श्लोक मनातल्या मनात म्हणावे....

समर्थ रामदास स्वामींनी रचलेले

 ।। मनाचे श्लोक ।।


गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥

नमूं शारदा मूळ चत्वार वाचा।
गमूं पंथ आनंत या राघवाचा॥१॥

मना सज्जना भक्तिपंथेचि जावें।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥

जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें।
जनीं वंद्य ते सर्व भावे करावे॥२॥

प्रभाते मनी राम चिंतीत जावा।
पुढे वैखरी राम आधी वदावा॥

सदाचार हा थोर सांडूं नये तो।
जनीं तोचि तो मानवी धन्य होतो॥३॥

मना वासना दुष्ट कामा न ये रे।
मना सर्वथा पापबुद्धी नको रे॥

मना सर्वथा नीति सोडूं नको हो।
मना अंतरीं सार वीचार राहो॥४॥

मना पापसंकल्प सोडूनि द्यावा।
मना सत्यसंकल्प जीवीं धरावा॥

मना कल्पना ते नको वीषयांची।
विकारे घडे हो जनी सर्व ची ची॥५॥

नको रे मना क्रोध हा खेदकारी।
नको रे मना काम नाना विकारी॥

नको रे मना सर्वदा अंगिकारू।
नको रे मना मत्सरु दंभ भारु॥६॥

मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावे।
मना बोलणे नीच सोशीत जावें॥

स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे।
मना सर्व लोकांसि रे नीववावें॥७॥

देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी।
मना सज्जना हेचि क्रीया धरावी॥

मना चंदनाचे परी त्वां झिजावे।
परी अंतरीं सज्जना नीववावे॥८॥

नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे।
अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे॥

घडे भोगणे पाप ते कर्म खोटे।
न होतां मनासारिखें दु:ख मोठे॥९॥

सदा सर्वदा प्रीती रामीं धरावी।
सुखाची स्वयें सांडि जीवी करावी॥

देहेदु:ख ते सूख मानीत जावे।
विवेके सदा स्वस्वरुपीं भरावें॥१०॥
__________________________________________________________

जनीं सर्वसूखी असा कोण आहे।
विचारें मना तुंचि शोधुनि पाहे॥

मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले।
तयासारिखे भोगणें प्राप्त जाले ॥११॥

मना मानसीं दु:ख आणूं नको रे।
मना सर्वथा शोक चिंता नको रे॥

विवेके देहेबुद्धि सोडूनि द्यावी।
विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी॥१२॥

मना सांग पां रावणा काय जाले।
अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले॥

म्हणोनी कुडी वासना सांड वेगीं।
बळे लागला काळ हा पाठिलागी॥१३॥

जिवा कर्मयोगे जनीं जन्म जाला।
परी शेवटीं काळमूखीं निमाला॥

महाथोर ते मृत्युपंथेचि गेले।
कितीएक ते जन्मले आणि मेले॥१४॥

मना पाहतां सत्य हे मृत्युभूमी।
जितां बोलती सर्वही जीव मी मी॥

चिरंजीव हे सर्वही मानिताती।
अकस्मात सांडूनिया सर्व जाती॥१५॥

मरे एक त्याचा दुजा शोक वाहे।
अकस्मात तोही पुढे जात आहे॥

पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्याते।
म्हणोनी जनीं मागुता जन्म घेते॥१६॥

मनीं मानवा व्यर्थ चिंता वहाते।
अकस्मात होणार होऊनि जाते॥

घडें भोगणे सर्वही कर्मयोगे।
मतीमंद तें खेद मानी वियोगें॥१७॥

मना राघवेंवीण आशा नको रे।
मना मानवाची नको कीर्ति तूं रे॥

जया वर्णिती वेद-शास्त्रे-पुराणें।
तया वर्णितां सर्वही श्लाघ्यवाणे॥१८॥

मना सर्वथा सत्य सांडूं नको रे।
मना सर्वथा मिथ्य मांडूं नको रे॥

मना सत्य ते सत्य वाचे वदावे।
मना मिथ्य तें मिथ्य सोडूनि द्यावें॥१९॥

बहू हिंपुटी होईजे मायपोटी।
नको रे मना यातना तेचि मोठी॥

निरोधें पचे कोंडिले गर्भवासी।
अधोमूख रे दु:ख त्या बाळकासीं॥२०॥
__________________________________________________________

मना वासना चूकवीं येरझारा।
मना कामना सांडी रे द्रव्यदारा॥

मना यातना थोर हे गर्भवासीं।
मना सज्जना भेटवीं राघवासीं॥२१॥

मना सज्जना हीत माझें करावें।
रघुनायका दृढ चित्ती धरावें॥

महाराज तो स्वामि वायुसुताचा।
जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा॥२२॥

न बोलें मना राघवेवीण कांहीं।
जनी वाउगें बोलता सुख नाहीं॥

घडिने घडी काळ आयुष्य नेतो।
देहांतीं तुला कोण सोडूं पहातो?॥२३॥

रघुनायकावीण वांया शिणावे।
जनासारिखे व्यर्थ कां वोसणावें॥

सदा सर्वदा नाम वाचे वसो दे।
अहंता मनी पापिणी ते नसो दे॥२४॥

मना वीट मानूं नको बोलण्याचा।
पुढें मागुता राम जोडेल कैंचा॥

सुखाची घडी लोटतां सूख आहे।
पुढें सर्व जाईल कांही न राहे॥२५॥

देहेरक्षणाकारणें यत्न केला।
परी शेवटीं काळ घेउन गेला॥

करीं रे मना भक्ति या राघवाची।
पुढें अंतरीं सोडिं चिंता भवाची॥२६॥

भवाच्या भये काय भीतोस लंडी।
धरीं रे मना धीर धाकासि सांडी॥

रघूनायकासारिखा स्वामि शीरीं।
नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी॥२७॥

दिनानाथ हा राम कोदंडधारी।
पुढें देखतां काळ पोटीं थरारी॥

मना वाक्य नेमस्त हे सत्य मानीं।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥२८॥

पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे।
वळें भक्तरीपूशिरी कांबि वाजे॥

पुरी वाहिली सर्व जेणे विमानीं।
नुपेक्षी कदा रामदासाभिमानी॥२९॥

समर्थाचिया सेचका वक्र पाहे।
असा सर्व भुमंडळी कोण आहे॥

जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३०॥
__________________________________________________________

महासंकटी सोडिले देव जेणें।
प्रतापे बळे आगळा सर्वगूणे॥

जयाते स्मरे शैलजा शूलपाणी।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३१॥

अहल्या शिळा राघवें मुक्त केली।
पदीं लागतां दिव्य होऊनि गेली॥

जया वर्णितां शीणली वेदवाणी।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३२॥

वसे मेरुमांदार हे सृष्टिलीला ।
शशी सूर्य तारांगणे मेघमाला॥

चिरंजीव केले जनी दास दोन्ही।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३३॥

उपेक्षी कदा रामरुपी असेना।
जिवां मानवां निश्चयो तो वसेना॥

शिरी भार वाहेन बोले पुराणीं।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३४॥

असे हो जया अंतरी भाव जैसा।
वसे हो तया अंतरी देव तैसा॥

अनन्यास रक्षीतसे चापपाणी।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३५॥

सदा सर्वदा देव सन्नीध आहे।
कृपाळुपणे अल्प धारीष्ट पाहे॥

सुखानंद आनंद कैवल्यदानी।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३६॥

सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा।
उडी घालितो संकटी स्वामि तैसा॥

हरीभक्तिचा घाव गाजे निशाणी।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३७॥

मना प्रार्थना तूजला एक आहे।
रघूराज थक्कीत होऊनि पाहे॥

अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे।
मना सज्जना राघवी वस्ति कीजे॥३८॥

जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे।
जयाचेनि योगें समाधान बाणे॥

तयालागिं हें सर्व चांचल्य दीजे।
मना सज्जना राघवी वस्ति कीजे॥३९॥

मना पाविजे सर्वही सूख जेथे।
अति आदरें ठेविजे लक्ष तेथें॥

विविकें कुडी कल्पना पालटिजे।
मना सज्जना राघवी वस्ति कीजे॥४०॥
__________________________________________________________

बहू हिंडतां सौख्य होणार नाहीं।
शिणावे परी नातुडे हीत कांहीं॥

विचारें बरें अंतरा बोधवीजे।
मना सज्जना राघवीं वस्ति कीजे॥४१॥

बहुतांपरी हेंचि आतां धरावें।
रघूनायका आपुलेसे करावें॥

दिनानाथ हें तोडरीं ब्रीद गाजे।
मना सज्जना राघवीं वस्ति कीजे॥४२॥

मना सज्जना एक जीवीं धरावें।
जनी आपुलें हीत तूवां करावें॥

रघूनायकावीण बोलो नको हो।
सदा मानसीं तो निजध्यास राहो॥४३॥

मना रे जनीं मौनमुद्रा धरावी।
कथा आदरे राघवाची करावी॥

नसें राम ते धाम सोडूनि द्यावे।
सुखालागिं आरण्य सेवीत जावे॥४४॥

जयाचेनि संगे समाधान भंगे।
अहंता अकस्मात येऊनि लागे॥

तये संगतीची जनीं कोण गोडी।
जिये संगतीनें मती राम सोडी॥४५॥

मना जे घडी राघवेवीण गेली।
जनीं आपुली ते तुवां हानि केली॥

रघूनायकावीण तो शीण आहे।
जनी दक्ष तो लक्ष लावूनि पाहे॥४६॥

मनीं लोचनीं श्रीहरी तोचि पाहे।
जनीं जाणतां मुक्त होऊनि राहे॥

गुणीं प्रीति राखे क्रमू साधनाचा।
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥४७॥

सदा देवकाजीं झिजे देह ज्याचा।
सदा रामनामें वदे नित्य साचा॥

स्वधर्मेचि चाले सदा उत्तमाचा।
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥४८॥

सदा बोलण्यासारिखे चालताहे।
अनेकीं सदा एक देवासि पाहे॥

सगूणी भजे लेश नाही भ्रमाचा।
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥४९॥

नसे अंतरी काम नानाविकारी।
उदासीन जो तापसी ब्रह्मचारी॥

निवाला मनीं लेश नाही तमाचा।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५०॥
__________________________________________________________

मदें मत्सरें सांडिली स्वार्थबुद्धी।
प्रपंचीक नाहीं जयातें उपाधी॥

सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५१॥

क्रमी वेळ जो तत्त्वचिंतानुवादे।
न लिंपे कदा दंभ वादे विवादे॥

करी सुखसंवाद जो उगमाचा।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५२॥

सदा आर्जवी प्रीय जो सर्व लोकीं।
सदा सर्वदा सत्यवादी विवेकी॥

 न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५३॥

सदा सेवि आरण्य तारुण्यकाळीं।
मिळेना कदा कल्पनेचेनि मेळी॥

चळेना मनीं निश्चयो दृढ ज्याचा।
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५४॥

नसे मानसीं नष्ट आशा दुराशा।
वसे अंतरीं प्रेमपाशा पिपाशा॥

ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५५॥

दिनाचा दयाळू मनाचा मवाळू।
स्नेहाळू कृपाळू जनीं दासपाळू॥

तया अंतरी क्रोध संताप कैंचा।
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५६॥

जगीं होइजे धन्य या रामनामे।
क्रिया भक्ति ऊपासना नित्य नेमे॥

उदासीनता तत्त्वता सार आहे।
सदा सर्वदा मोकळी वृत्ति राहे ॥५७॥

नको वासना वीषयीं वृत्तिरुपें।
पदार्थी जडे कामना पूर्वपापें॥

सदा राम निष्काम चिंतीत जावा।
मना कल्पनालेश तोहि नसावा॥५८॥

मना कल्पना कल्पितां कल्पकोटी।
नव्हे रे नव्हे सर्वथा रामभेटी॥

मनीं कामना राम नाही जयाला।
अती आदरे प्रीती नाही तयाला॥५९॥

मना राम कल्पतरु कामधेनु।
निधी सार चिंतामणी काय वानूं॥

जयाचेनि योगे घडे सर्व सत्ता।
तया साम्यता कायसी कोण आतां॥६०॥
__________________________________________________________

उभा कल्पवृक्षातळीं दु:ख वाहे।
तया अंतरीं सर्वदा तेचि आहे॥

जनी सज्जनी वाद हा वाढवावा।
पुढें मागता शोक जीवीं धरावा॥६१॥

निजध्यास तो सर्व तुटोनि गेला।
बळें अंतरीं शोक संताप ठेला॥

सुखानंद आनंद भेदें बुडाला।
मना निश्चयो सर्व खेदे उडाला॥६२॥

घरी कामधेनू पुढें ताक मागें।
हरीबोध सांडोनि वेवाद लागे॥

करी सार चिंतामणी काचखंडे।
तया मागतां देत आहे उदंडे॥६३॥

अती मूढ त्या दृढ बुद्धि असेना।
अती काम त्या राम चित्ती वसेना॥

अती लोभ त्या क्षोभ होइल जाणा।
अती वीषयी सर्वदा दैन्यवाणा॥६४॥

नको दैन्यवाणें जिणे भक्तिऊणे।
अती मुर्ख त्या सर्वदा दु:ख दूणे॥

धरीं रे मना आदरें प्रीति रामी।
नको वासना हेमधामीं विरामीं॥६५॥

नव्हे सार संसार हा घोर आहे।
मना सज्जना सत्य शोधुनि पाहे॥

जनीं वीष खातां पुढे सूख कैचे।
करीं रे मना ध्यान या राघवाचें॥६६॥

घनश्याम हा राम लावण्यरुपी।
महाधीर गंभीर पूर्णप्रतापी॥

करी संकटीं सेवकांचा कुडावा।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥६७॥

बळें आगळा राम कोदंडधारी।
महाकाळ विक्राळ तोही थरारी॥

पुढे मानवा किंकरा कोण केवा।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥६८॥

सुखानंदकारी निवारी भयातें।
जनीं भक्तिभावे भजावे तयातें॥

विवेके त्यजावा अनाचार हेवा।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥६९॥

सदा रामनामे वदा पुर्णकामें।
कदा बाधिजेना ऽऽ पदा नित्य नेमें॥

मदालस्य हा सर्व सोडोनि द्यावा।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥७०॥
__________________________________________________________

जयाचेनि नामें महादोष जाती।
जयाचेनि नामें गती पाविजेती॥

जयाचेनि नामें घडे पुण्यठेवा।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥७१॥

न वेचे कदा ग्रंथचि अर्थ काही।
मुखे नाम उच्चारितां कष्ट नाहीं॥

महाघोर संसारशत्रु जिणावा।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥७२॥

देहेदंडणेचे महादु:ख आहे।
महादु:ख तें नाम घेता न राहे॥

सदाशीव चिंतीतसे देवदेवा।
प्रभाते मनीं राम चिंतीत जावा॥७३॥

बहुतांपरी संकटे साधनांची।
व्रते दान उद्यापने ती धनाची॥

दिनाचा दयाळू मनी आठवावा।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥७४॥

समस्तामधे सार साचार आहे।
कळेना तरी सर्व शोधुन पाहे॥

जिवा संशयो वाउगा तो त्यजावा।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥७५॥

नव्हे कर्म ना धर्म ना योग कांही।
नव्हे भोग ना त्याग ना सांग पाहीं॥

म्हणे दास विश्वास नामी धरावा।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥७६।

करी काम निष्काम या राघवाचे।
करी रुप स्वरुप सर्वां जिवांचे ॥

करि छंद निर्द्वद्व हे गुण गातां।
हरीकीर्तनी वृत्तिविश्वास होतां॥७७॥

अहो ज्या नरा रामविश्वास नाहीं।
तया पामरा बाधिजे सर्व कांही॥

महाराज तो स्वामि कैवल्यदाता।
वृथा वाहणें देहसंसारचिंता॥७८॥

मना पावना भावना राघवाची।
धरी अंतरीं सोडिं चिंता भवाची॥

भवाची जिवा मानवा भूलि ठेली।
नसे वस्तुचि धारणा व्यर्थ गेली॥७९॥

धरा श्रीवरा त्या हरा अंतराते।
तरा दुस्तरा त्या परा सागराते॥

सरा वीसरा त्या भरा दुर्भराते।
करा नीकरा त्या खरा मत्सराते॥८०॥
__________________________________________________________

मना मत्सरे नाम सांडूं नको हो।
अती आदरे हा निजध्यास राहो॥

समस्तांमधे नाम हे सार आहे।
दुजी तूळणा तूळितांही न साहे॥८१॥

बहु नाम या रामनामी तुळेना।
अभाग्या नरा पामरा हे कळेंना॥

विषा औषधा घेतले पार्वतीशे।
जिवा मानवा किंकरा कोण पुसे॥८२॥

जेणे जाळिला काम तो राम ध्यातो।
उमेसी अती आदरें गूण गातो॥

बहु ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथें।
परी अंतरी नामविश्वास तेथें॥८३॥

विठोने शिरी वाहिला देवराणा।
तया अंतरी ध्यास रे त्यासि नेणा॥

निवाला स्वये तापसी चंद्रमौळी।
जिवा सोडवी राम हा अंतकाळीं॥८४॥

भजा राम विश्राम योगेश्वरांचा।
जपू नेमिला नेम गौरीहराचा॥

स्वये नीववी तापसी चंद्रमौळी।
तुम्हां सोडवी राम हा अंतकाळीं॥८५॥

मुखी राम विश्राम तेथेचि आहे।
सदानंद आनंद सेवोनि आहे॥

तयावीण तो शीण संदेहकारी।
निजधाम हे नाम शोकापहारी॥८६॥

मुखी राम त्या काम बाधुं शकेना।
गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना॥

हरीभक्त तो शक्त कामास भारी।
जगीं धन्य तो मारुती ब्रह्मचारी॥८७॥

बहू चांगले नाम या राघवाचे।
अती साजिरे स्वल्प सोपे फुकाचे॥

करी मूळ निर्मूळ घेता भवाचे।
जिवां मानवां हेंचि कैवल्य साचें॥८८॥

जनीं भोजनी नाम वाचे वदावें।
अती आदरे गद्यघोषे म्हणावे॥

हरीचिंतने अन्न सेवीत जावे।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥८९॥

न ये राम वाणी तया थोर हाणी।
जनीं व्यर्थ प्राणी तया नाम कोणी॥

हरीनाम हें वेदशास्त्रीं पुराणीं।
बहू आगळे बोलिली व्यासवाणी॥९०॥
__________________________________________________________

नको वीट मानूं रघुनायकाचा।
अती आदरे बोलिजे राम वाचा॥

न वेंचे मुखी सांपडे रे फुकाचा।
करीं घोष त्या जानकीवल्लभाचा॥९१॥

अती आदरें सर्वही नामघोषे।
गिरीकंदरी जाइजे दूरि दोषें॥

हरी तिष्ठतू तोषला नामघोषें।
विशेषें हरामानसीं रामपीसें॥९२॥

जगीं पाहतां देव हा अन्नदाता।
तया लागली तत्त्वता सार चिंता॥

तयाचे मुखी नाम घेता फुकाचे।
मना सांग पां रे तुझे काय वेंचे॥९३॥

तिन्ही लोक जाळुं शके कोप येतां।
निवाला हरु तो मुखे नाम घेतां॥

जपे आदरें पार्वती विश्वमाता।
म्हणोनी म्हणा तेंचि हे नाम आतां॥९४॥

अजामेळ पापी वदे पुत्रकामे।
तया मुक्ति नारायणाचेनि नामें॥

शुकाकारणे कुंटणी राम वाणी।
मुखें बोलतां ख्याति जाली पुराणीं॥९५॥

महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकूळीं।
जपे रामनामावळी नित्यकाळीं॥

पिता पापरुपी तया देखवेना।
जनी दैत्य तो नाम मुखे म्हणेना॥९६॥

मुखी नाम नाहीं तया मुक्ति कैंची।
अहंतागुणे यातना ते फुकाची॥

पुढे अंत येईल तो दैन्यवाणा।
म्हणोनि म्हणा रे म्हणा देवराणा॥९७॥

हरीनाम नेमस्त पाषाण तारी।
बहु तारीले मानवी देहधारी॥

तया रामनामीं सदा जो विकल्पी।
वदेना कदा जीव तो पापरूपी॥९८॥

जगीं धन्य वाराणसी पुण्यराशी।
तयेमाजि आतां गतीं पूर्वजांसी॥

मुखे रामनामावळी नित्य काळीं।
जिवा हित सांगे सदा चंद्रमौळी॥९९॥

यथासांग रे कर्म तेंहि घडेना।
घडे धर्म तें पुण्य गांठी पडेना॥

दया पाहतां सर्व भुतीं असेना।
फुकाचे मुखी नाम तेंही वसेना॥१००॥
__________________________________________________________

जया नावडे नाम त्या यम जाची।
विकल्पे उठे तर्क त्या नर्क ची ची॥

म्हणोनि अती आदरे नाम घ्यावे।
मुखे बोलतां दोष जाती स्वभावें॥१०१॥

अती लीनता सर्वभावे स्वभावें।
जना सज्जनालागिं संतोषवावे॥

देहे कारणीं सर्व लावीत जावें।
सगूणीं अती आदरेसी भजावें॥१०२॥

हरीकीर्तनीं प्रीति रामीं धरावी।
देहेबुद्धि नीरूपणीं वीसरावी॥

परद्रव्य आणीक कांता परावी।
यदर्थीं मना सांडि जीवीं करावी॥१०३॥

क्रियेवीण नानापरी बोलिजेंते।
परी चित्त दुश्चीत तें लाजवीतें॥

मना कल्पना धीट सैराट धांवे।
तया मानवा देव कैसेनि पावे॥१०४॥

विवेके क्रिया आपुली पालटावी।
अती आदरे शुद्ध क्रीया धरावी॥

जनीं बोलण्यासारिखे चाल बापा।
मना कल्पना सोडिं संसारतापा॥१०५॥

बरी स्नानसंध्या करी एकनिष्ठा।
विवेके मना आवरी स्थानभ्रष्टा॥

दया सर्वभुतीं जया मानवाला।
सदा प्रेमळू भक्तिभावे निवाला॥१०६॥

मना कोपआरोपणा ते नसावी।
मना बुद्धि हे साधुसंगी वसावी॥

मना नष्ट चांडाळ तो संग त्यागीं।
मना होइ रे मोक्षभागी विभागी॥१०७॥

मना सर्वदा सज्जनाचेनि योगें।
क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे॥

क्रियेवीण वाचाळता ते निवारी।
तुटे वाद संवाद तो हीतकारी॥१०८॥

जनीं वादवेवाद सोडूनि द्यावा।
जनीं वादसंवाद सूखे करावा॥

जगीं तोचि तो शोकसंतापहारी।
तुटे वाद संवाद तो हीतकारी॥१०९॥

तुटे वाद संवाद त्याते म्हणावें।
विवेके अहंभाव यातें जिणावें॥

अहंतागुणे वाद नाना विकारी।
तुटे वाद संवाद तो हीतकारी॥११०॥
__________________________________________________________

हिताकारणे बोलणे सत्य आहे।
हिताकारणे सर्व शोधुनि पाहें॥

हितकारणे बंड पाखांड वारी।
तुटे वाद संवाद तो हीतकारी॥१११॥

जनीं सांगतां ऐकता जन्म गेला।
परी वादवेवाद तैसाचि ठेला॥

उठे संशयो वाद हा दंभधारी।
तुटे वाद संवाद तो हीतकारी॥११२॥

जनी हीत पंडीत सांडीत गेले।
अहंतागुणे ब्रह्मराक्षस जाले॥

तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे।
मना सर्व जाणीव सांडुनि राहे॥११३॥

फुकाचे मुखी बोलतां काय वेचे।
दिसंदीस अभ्यंतरी गर्व सांचे॥

क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे।
विचारे तुझा तूंचि शोधुनि पाहे॥११४॥

तुटे वाद संवाद तेथें करावा।
विवेके अहंभाव हा पालटावा॥

जनीं बोलण्यासारिखे आचरावें।
क्रियापालटे भक्तिपंथेचि जावे॥११५॥

बहू शापिता कष्टला अंबऋषी।
तयाचे स्वये श्रीहरी जन्म सोशी॥

दिला क्षीरसिंधु तया ऊपमानी।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥११६॥

धुरू लेकरु बापुडे दैन्यवाणे।
कृपा भाकितां दीधली भेटी जेणे॥

चिरंजीव तारांगणी प्रेमखाणी।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥११७॥

गजेंदु महासंकटी वास पाहे।
तयाकारणे श्रीहरी धांवताहे॥

उडी घातली जाहला जीवदानी।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥११८॥

अजामेळ पापी तया अंत आला।
कृपाळूपणे तो जनीं मुक्त केला॥

अनाथासि आधार हा चक्रपाणी।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥११९॥

विधीकारणे जाहला मत्स्य वेगीं।
धरी कूर्मरुपे धरा पृष्ठभागी।

जना रक्षणाकारणे नीच योनी।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥१२०॥
__________________________________________________________

महाभक्त प्रल्हाद हा कष्टवीला।
म्हणोनी तयाकारणे सिंह जाला॥

न ये ज्वाळ वीशाळ संनधि कोणी।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥१२१॥

कृपा भाकिता जाहला वज्रपाणी।
तया कारणें वामनू चक्रपाणी॥

द्विजांकारणे भार्गवू चापपाणी।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥१२२॥

अहल्येसतीलागी आरण्यपंथे।
कुडावा पुढे देव बंदी तयांते॥

बळे सोडितां घाव घालीं निशाणी।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥१२३॥

तये द्रौपदीकारणे लागवेगे।
त्वरे धांवतो सर्व सांडूनि मागें॥

कळीलागिं जाला असे बौद्ध मौनी।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥१२४॥

अनाथां दिनांकारणे जन्मताहे।
कलंकी पुढे देव होणार आहे॥

तया वर्णिता शीणली वेदवाणी।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥१२५॥

जनांकारणे देव लीलावतारी।
बहुतांपरी आदरें वेषधारी॥

तया नेणती ते जन पापरूपी।
दुरात्मे महानष्ट चांडाळ पापी॥१२६॥

जगीं धन्य तो रामसूखें निवाला।
कथा ऐकतां सर्व तल्लीन जाला॥

देहेभावना रामबोधे उडाली।
मनोवासना रामरूपीं बुडाली॥१२७॥

मना वासना वासुदेवीं वसों दे।
मना कामना कामसंगी नसो दे॥

मना कल्पना वाउगी ते न कीजे।
मना सज्जना सज्जनी वस्ति कीजे॥१२८॥

गतीकारणे संगती सज्जनाची।
मती पालटे सूमती दुर्जनाची॥

रतीनायिकेचा पती नष्ट आहे।
म्हणोनी मनाऽतीत होवोनि राहे॥१२९॥

मना अल्प संकल्प तोही नसावा।
सदा सत्यसंकल्प चित्तीं वसावा॥

जनीं जल्प वीकल्प तोही त्यजावा।
रमाकांत एकान्तकाळी भजावा॥१३०॥
__________________________________________________________

भजाया जनीं पाहतां राम एकू।
करी बाण एकू मुखी शब्द एकू॥

क्रिया पाहतां उद्धरे सर्व लोकू।
धरा जानकीनायकाचा विवेकू॥१३१॥

विचारूनि बोले विवंचूनि चाले।
तयाचेनि संतप्त तेही निवाले॥

बरें शोधल्यावीण बोलो नको हो।
जनी चालणे शुद्ध नेमस्त राहो॥१३२॥

हरीभक्त वीरक्त विज्ञानराशी।
जेणे मानसी स्थापिलें निश्चयासी॥

तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे।
तया भाषणें नष्ट संदेह मोडे॥१३३॥

नसे गर्व आंगी सदा वीतरागी।
क्षमा शांति भोगी दयादक्ष योगी॥

नसे लोभ ना क्षोम ना दैन्यवाणा।
इहीं लक्षणी जाणिजे योगिराणा॥१३४॥

धरीं रे मना संगती सज्जनाची।
जेणें वृत्ति हे पालटे दुर्जनाची॥

बळे भाव सद्बुद्धि सन्मार्ग लागे।
महाक्रुर तो काळ विक्राळ भंगे॥१३५॥

भयें व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे।
भयातीत तें संत आनंत पाहे॥

जया पाहतां द्वैत कांही दिसेना।
भयो मानसीं सर्वथाही असेना॥१३६॥

जिवां श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोनि गेले।
परी जीव अज्ञान तैसेचि ठेले॥

देहेबुद्धिचें कर्म खोटें टळेना।
जुने ठेवणें मीपणें आकळेना॥१३७॥

भ्रमे नाढळे वित्त तें गुप्त जाले।
जिवा जन्मदारिद्र्य ठाकुनि आले॥

देहेबुद्धिचा निश्चयो ज्या टळेना।
जुने ठेवणे मीपणे आकळेना॥१३८॥

पुढें पाहता सर्वही कोंदलेसें।
अभाग्यास हें दृश्य पाषाण भासे॥

अभावे कदा पुण्य गांठी पडेना।
जुने ठेवणे मीपणे आकळेना॥१३९॥

जयाचे तया चूकले प्राप्त नाहीं।
गुणे गोविले जाहले दुःख देहीं ॥

गुणावेगळी वृत्ति तेहि वळेना।
जुने ठेवणे मीपणे आकळेना॥१४०॥
__________________________________________________________

म्हणे दास सायास त्याचे करावे।
जनीं जाणता पाय त्याचे धरावे॥

गुरू अंजनेवीण तें आकळेना।
जुने ठेवणे मीपणे ते कळेना॥१४१॥

कळेना कळेना कळेना कळेना।
ढळे नाढळे संशयोही ढळेना॥

गळेना गळेना अहंता गळेना।
बळें आकळेना मिळेना मिळेना॥१४२॥

अविद्यागुणे मानवा उमजेना।
भ्रमे चुकले हीत ते आकळेना॥

परीक्षेविणे बांधले दृढ नाणें।
परी सत्य मिथ्या असें कोण जाणें॥१४३॥

जगी पाहतां साच ते काय आहे।
अती आदरे सत्य शोधुन पाहे॥

पुढे पाहतां पाहतां देव जोडे।
भ्रम भ्रांति अज्ञान हें सर्व मोडे॥१४४॥

सदा वीषयो चिंतितां जीव जाला।
अहंभाव अज्ञान जन्मास आला॥

विवेके सदा स्वस्वरुपी भरावे।
जिवा ऊगमी जन्म नाही स्वभावें॥१४५॥

दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी।
अकस्मात आकारले काळ मोडी॥

पुढे सर्व जाईल कांही न राहे।
मना संत आनंत शोधुनि पाहे॥१४६॥

फुटेना तुटेना चळेना ढळेना।
सदा संचले मीपणे ते कळेना॥

तया एकरूपासि दूजे न साहे।
मना संत आनंत शोधुनि पाहें॥१४७॥

निराकार आधार ब्रह्मादिकांचा।
जया सांगतां शीणली वेदवाचा॥

विवेके तदाकार होऊनि राहें।
मना संत आनंत शोधुनि पाहे॥१४८॥

जगी पाहतां चर्मलक्षी न लक्षे।
जगी पाहता ज्ञानचक्षी निरक्षे॥

जनीं पाहता पाहणे जात आहे।
मना संत आनंत शोधुनि पाहे॥१४९॥

नसे पीत ना श्वेत ना श्याम कांही।
नसे व्यक्त अव्यक्त ना नीळ नाहीं॥

म्हणे दास विश्वासतां मुक्ति लाहे।
मना संत आनंत शोधुनि पाहे॥१५०॥
__________________________________________________________

खरें शोधितां शोधितां शोधिताहे।
मना बोधिता बोधिता बोधिताहे॥

परी सर्वही सज्जनाचेनि योगे।
बरा निश्चयो पाविजे सानुरागे॥१५१॥

बहूतांपरी कूसरी तत्त्वझाडा।
परी अंतरी पाहिजे तो निवाडा॥

मना सार साचार ते वेगळे रे।
समस्तांमधे एक ते आगळे रे॥१५२॥

नव्हे पिंडज्ञाने नव्हे तत्त्वज्ञाने ।
समाधान कांही नव्हे तानमाने॥

नव्हे योगयागें नव्हे भोगत्यागें।
समाधान ते सज्जनाचेनि योगे॥१५३॥

महावाक्य तत्त्वादिके पंचकर्णे।
खुणे पाविजे संतसंगे विवर्णे॥

द्वितीयेसि संकेत जो दाविजेतो।
तया सांडुनी चंद्रमा भाविजेतो॥१५४॥

दिसेना जनी तेचि शोधुनि पाहे।
बरे पाहता गूज तेथेचि आहे॥

करी घेउ जाता कदा आढळेना।
जनी सर्व कोंदाटले ते कळेना॥१५५॥

म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे।
अतर्कासि तर्की असा कोण आहे॥

जनीं मीपणे पाहता पाहवेना।
तया लक्षितां वेगळे राहवेना॥१५६॥

बहू शास्त्र धुंडाळता वाड आहे।
जया निश्चयो येक तोही न साहे॥

मती भांडती शास्त्रबोधे विरोधें।
गती खुंटती ज्ञानबोधे प्रबोधे॥१५७॥

श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे।
स्मृती वेद वेदान्तवाक्ये विचित्रे॥

स्वये शेष मौनावला स्थीर पाहे।
मना सर्व जाणीव सांडून राहे॥१५८॥

जेणे मक्षिका भक्षिली जाणिवेची।
तया भोजनाची रुची प्राप्त कैची॥

अहंभाव ज्या मानसीचा विरेना।
तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना॥१५९॥

नको रे मना वाद हा खेदकारी।
नको रे मना भेद नानाविकारी॥

नको रे मना शीकवूं पूढिलांसी।
अहंभाव जो राहिला तूजपासी॥१६०॥
__________________________________________________________

अहंतागुणे सर्वही दुःख होते।
मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते॥

सुखी राहता सर्वही सूख आहे।
अहंता तुझी तुंचि शोधुन पाहे॥१६१॥

अहंतागुणे नीति सांडी विवेकी।
अनीतीबळे श्लाघ्यता सर्व लोकी॥

परी अंतरी अर्वही साक्ष येते।
प्रमाणांतरे बुद्धि सांडूनि जाते॥१६२॥

देहेबुद्धिचा निश्चयो दृढ जाला।
देहातीत ते हीत सांडीत गेला॥

देहेबुद्धि ते आत्मबुद्धि करावी।
सदा संगती सज्जनाची धरावी॥१६३॥

मनें कल्पिला वीषयो सोडवावा।
मनें देव निर्गूण तो ओळखावा॥

मनें कल्पिता कल्पना ते सरावी।
सदा संगती सज्जनाची धरावी॥१६४॥

देहादीक प्रपंच हा चिंतियेला।
परी अंतरी लोभ निश्चित ठेला॥

हरीचिंतने मुक्तिकांता करावी।
सदा संगती सज्जनांची धरावी॥१६५॥

अहंकार विस्तारला या देहाचा।
स्त्रियापुत्रमित्रादिके मोह त्यांचा॥

बळे भ्रांति हें जन्मचिंता हरावी।
सदा संगती सज्जनांची धरावी॥१६६॥

बरा निश्चयो शाश्वताचा करावा।
म्हणे दास संदेह तो वीसरावा॥

घडीने घडी सार्थकाची धरावी।
सदा संगती सज्जनांची धरावी॥१६७॥

करी वृत्ती जो संत तो संत जाणा।
दुराशागुणे जो नव्हे दैन्यवाणा॥

उपाधी देहेबुद्धीते वाढवीते।
परी सज्जना केविं बाधु शके ते॥१६८॥

नसे अंत आनंत संता पुसावा।
अहंकारविस्तार हा नीरसावा॥

गुणेवीण निर्गुण तो आठवावा।
देहेबुद्धिचा आठवु नाठवावा॥१६९॥

देहेबुद्धि हे ज्ञानबोधे त्यजावी।
विवेके तये वस्तुची भेटी घ्यावी॥

तदाकार हे वृत्ति नाही स्वभावे।
म्हणोनी सदा तेचि शोधीत जावे॥१७०॥
__________________________________________________________

असे सार साचार तें चोरलेसे।
इहीं लोचनी पाहता दृश्य भासे॥

निराभास निर्गुण तें आकळेना।
अहंतागुणे कल्पिताही कळेना॥१७१॥

स्फुरे वीषयी कल्पना ते अविद्या।
स्फुरे ब्रह्म रे जाण माया सुविद्या॥

मुळीं कल्पना दो रुपें तेचि जाली।
विवेके तरी स्वस्वरुपी मिळाली॥१७२॥

स्वरुपी उदेला अहंकार राहो।
तेणे सर्व आच्छादिले व्योम पाहो॥

दिशा पाहतां ते निशा वाढताहे।
विवेके विचारे विवंचुनि पाहे॥१७३॥

जया चक्षुने लक्षिता लक्षवेना।
भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना॥

क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो।
दयादक्ष तो साक्षिने पक्ष घेतो॥१७४॥

विधी निर्मिती लीहितो सर्व भाळी।
परी लीहिता कोण त्याचे कपाळी॥

हरू जाळितो लोक संहारकाळी।
परी शेवटी शंकरा कोण जाळी॥१७५॥

जगी द्वादशादित्य हे रुद्र अक्रा।
असंख्यात संख्या करी कोण शक्रा॥

जगी देव धुंडाळिता आढळेना।
जगी मुख्य तो कोण कैसा कळेना॥१७६॥

तुटेना फुटेना कदा देवराणा।
चळेना ढळेना कदा दैन्यवाणा॥

कळेना कळेना कदा लोचनासी।
वसेना दिसेना जगी मीपणासी॥१७७॥

जया मानला देव तो पुजिताहे।
परी देव शोधुनि कोणी न पाहे॥

जगी पाहता देव कोट्यानुकोटी।
जया मानली भक्ति जे तेचि मोठी॥१७८॥

तिन्ही लोक जेथूनि निर्माण झाले।
तया देवरायासि कोणी न बोले॥

जगीं थोरला देव तो चोरलासे।
गुरूवीण तो सर्वथाही न दीसे॥१७९॥

गुरु पाहता पाहता लक्ष कोटी।
बहूसाल मंत्रावळी शक्ति मोठी॥

मनी कामना चेटके धातमाता।
जनी व्यर्थ रे तो नव्हे मुक्तिदाता॥१८०॥
__________________________________________________________

नव्हे चेटकी चाळकू द्रव्यभोंदु।
नव्हे निंदकू मत्सरू भक्तिमंदू॥

नव्हे उन्मतू वेसनी संगबाधू।
जनी ज्ञानिया तोचि साधु अगाधू॥१८१॥

नव्हे वाउगी चाहुटी काम पोटी।
क्रियेवीण वाचाळता तेचि मोठी॥

मुखे बोलिल्यासारिखे चालताहे।
मना सद्गुरु तोचि शोधुनि पाहे॥१८२॥

जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी।
कृपाळु मनस्वी क्षमावंत योगी॥

प्रभु दक्ष व्युत्पन्न चातुर्य जाणे।
तयाचेनि योगे समाधान बाणे॥१८३॥

नव्हे तोचि जाले नसे तेचि आले।
कळो लागले सज्जनाचेनि बोले॥

अनिर्वाच्य ते वाच्य वाचे वदावे।
मना संत आनंत शोधीत जावे॥१८४॥

लपावे अति आदरे रामरुपी।
भयातीत निश्चीत ये स्वस्वरुपी॥

कदा तो जनी पाहतांही दिसेना।
सदा ऐक्य तो भिन्नभावे वसेना॥१८५॥

सदा सर्वदा राम सन्नीध आहे।
मना सज्जना सत्य शोधुन पाहे॥

अखंडीत भेटी रघूराजयोगू।
मना सांडीं रे मीपणाचा वियोगू॥१८६॥

भुते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे।
परी सर्वही स्वस्वरुपी न साहे॥

मना भासले सर्व काही पहावे।
परी संग सोडुनि सुखी रहावे॥१८७॥

देहेभान हे ज्ञानशस्त्रे खुडावे।
विदेहीपणे भक्तिमार्गेचि जावे॥

विरक्तीबळे निंद्य सर्वै त्यजावे।
परी संग सोडुनि सुखी रहावे॥१८८॥

मही निर्मिली देव तो ओळखावा।
जया पाहतां मोक्ष तत्काळ जीवा॥

तया निर्गुणालागी गूणी पहावे।
परी संग सोडुनि सुखे रहावे॥१८९॥

नव्हे कार्यकर्ता नव्हे सृष्टिभर्ता।
पुरेहून पर्ता न लिंपे विवर्ता॥

तया निर्विकल्पासि कल्पित जावे।
परि संग सोडुनि सुखे रहावे॥१९०॥
__________________________________________________________

देहेबुद्धिचा निश्चयो ज्या ढळेना।
तया ज्ञान कल्पांतकाळी कळेना॥

परब्रह्म तें मीपणे आकळेना।
मनी शून्य अज्ञान हे मावळेना॥१९१॥

मना ना कळे ना ढळे रुप ज्याचे।
दुजेवीण तें ध्यान सर्वोत्तमाचे॥

तया खुण ते हीन दृष्टांत पाहे।
तेथे संग निःसंग दोन्ही न साहे॥१९२॥

नव्हे जाणता नेणता देवराणा।
न ये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा॥

नव्हे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा।
श्रुती नेणती नेणती अंत त्याचा॥१९३॥

वसे हृदयी देव तो कोण कैसा।
पुसे आदरे साधकू प्रश्न ऐसा॥

देहे टाकिता देव कोठे पहातो ।
परि मागुता ठाव कोठे रहातो॥१९४॥

बसे हृदयी देव तो जाण ऐसा।
नभाचेपरी व्यापकू जाण तैसा॥

सदा संचला येत ना जात कांही।
तयावीण कोठे रिता ठाव नाही॥१९५॥

नभी वावरे जा अणुरेणु काही।
रिता ठाव या राघवेवीण नाही॥

तया पाहता पाहता तोचि जाले।
तेथे लक्ष आलक्ष सर्वे बुडाले॥१९६॥

नभासारिखे रुप या राघवाचे।
मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे॥

तया पाहता देहबुद्धी उरेना।
सदा सर्वदा आर्त पोटी पुरेना॥१९७॥

नभे व्यापिले सर्व सृष्टीस आहे।
रघूनायका ऊपमा ते न साहे॥

दुजेवीण जो तोचि तो हा स्वभावे।
तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे॥१९८॥

अती जीर्ण विस्तीर्ण ते रुप आहे।
तेथे तर्कसंपर्क तोही न साहे॥

अती गुढ ते दृश्य तत्काळ सोपे।
दुजेवीण जे खुण स्वामिप्रतापे॥१९९॥

कळे आकळे रुप ते ज्ञान होता।
तेथे आटली सर्वसाक्षी अवस्था॥

मना उन्मनी शब्द कुंठीत राहे।
तो रे तोचि तो राम सर्वत्र पाहे॥२००॥
__________________________________________________________

कदा ओळखीमाजि दूजे दिसेना।
मनी मानसी द्वैत काही वसेना॥

बहूता दिसा आपली भेट जाली।
विदेहीपणे सर्व काया निवाली॥२०१॥

मना गुज रे तूज हे प्राप्त झाले।
परी अंतरी पाहिजे यत्न केले॥

सदा श्रवणे पाविजे निश्चयासी।
धरी सज्जनसंगती धन्य होसी॥२०२॥

मना सर्वही संग सोडूनि द्यावा।
अती आदरे सज्जनाचा धरावा॥

जयाचेनि संगे महादुःख भंगे।
जनी साधनेवीण सन्मार्ग लागे॥२०३॥

मना संग हा सर्वसंगास तोडी।
मना संग हा मोक्ष तात्काळ जोडी॥

मना संग हा साधना शीघ्र सोडी।
मना संग हा द्वैत निःशेष मोडी॥२०४॥

मनाची शते ऐकता दोष जाती।
मतीमंद ते साधना योग्य होती॥

चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी।
म्हणे दास विश्वासत मुक्ति भोगी॥२०५॥

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

*** मनाचे श्लोक संपूर्ण***