Tuesday 22 March 2011

पण कुणाला त्याचे काय?

असेन मी कीतीही साधा
पण कुणाला त्याचे काय....

असेन मी कीतीही भोळा
पण कुणाला त्याचे काय....

असेन मी कीतीही प्रेमळ
पण कुणाला त्याचे काय....

असेन मी कीतीही सज्जन
पण कुणाला त्याचे काय....

असेन मी कीतीही भावूक
पण कुणाला त्याचे काय....

असेन मी कीतीही उदास
पण कुणाला त्याचे काय....

असेन मी कीतीही - कीतीही काय
पण कुणाला त्याचे काय....

कारण ???????

या जगात मला...
कुणीही समजू शकत नाय
कुणीही समजू शकत नाय...................................
                                                                       
   *** लिंगुराम शापित



तुम्हाला काय वाटते ?


जीवन जगत असताना फार वेगवेगळे अनुभव सर्वांना येतात. कुणी त्यातुन काही शिकतो तर कुणी ..........

मलाही असे अनुभव फार आले आणि त्यातून माझी वागण्याची लयच बदलून गेली. मी माझ्या मनावर ताबा (पूर्ण नाही) मिळवला आणि मनाला व मला या अनुभवांतुन मनाला जे पटते त्या प्रकारे वागण्याचा प्रयत्न सुरु केला.

असे जगत असताना आपण जे वागतो ते इतरांना आवडत नाही - त्यांना रुचत नाही , बरोबर आहे असे वाटते पण बरोबर असे बोलण्याची हिंमत होत नाही.

अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मला तुम्हाला विचारायच्या आहेत. अशा प्रसंगाची कल्पना करुन  सांगा तुम्हाला काय वाटते ?

प्रसंग १ : अनेकदा असे होते की प्रत्येकाच्या तोंडून आपल्याला ऐकायला मिळते की जर माझ्या तोंडावर कुणी माझ्याबद्दल काही बोलले तर चालेल म्हणजे आपल्या काही वाईट गोष्टींहद्दल, मग मला एवढा राग आला नसता पण माझ्या मागे बोलले जाते याची मला फार चिड येते..........

पण खरोखरच असे जर कोणाच्या तोंडावर आपण जर त्याच्या वाईट गुणांविषयी आपल्याला कीतीही वाटले तरी बोललो तर परीणाम काय होतील ? विचार करा आणि सांगा तुम्हाला काय वाटते ?????????


प्रसंग २ : स्वतःला देवाचा भक्त किंवा देव देव करणारे, देवाची भजने, उपास-तापास करणारे अनेक आपण पाहातो. देवळात जाउन देवाच्या गाभा-याबाहेर असलेल्या दानपेटीत दान टाकून स्वतःला धन्य माननारे आपण पाहातो. पण अश्या सगळ्यांना पाहून मला वाटते की हे सारे खरे आहे का ? त्यांच्या मनात खरोखरच देवाची भक्ती आहे का ? का हा फक्त वरवरचा देखावा. कारण जो देवाची मनोभावे पूजा करून, दान दक्षीणा देऊन देवळाबाहेर येतो तोच देवळाच्या बाहेर एखादा भिकारी दिसला तर त्याला शिव्या देवून हाकलवून देतो(यात काही अपवादही आहेत) .

किंवा स्वतःला काही पूण्य लाभावे म्हणून कबूतरांना रोज चिक्कार दाणे घालणारे आपण पाहतो. पण खरचं त्या कबूतरांना वाया जाईपर्यंत दाणे घालणे गरजेचं आहे का ?

कित्येकजण पिंपळाच्या झाडाच्या बुंध्याजवळ दिवाबत्ती करतात. अगदी झाडाच्या मुळाजवळ खड्डा करून त्यात कापूर वगैरे जाळतात. कित्येकजण तर झाडाच्या मधल्या ढोलीतच बत्ती लावतात. का तर ह्यांना कोणीतरी सांगीतलेल असतं की पिंपळाची पुजा केल्यावर चांगलं घडेल . म्हणून पिंपळाच्या मुळात बत्ती लावून त्या झाडाला त्रास दिला जतो याबद्दल तुम्हाला काय वाटते ??????


प्रसंग ३ : पैसा ही अशी गोष्ट आहे की ती ज्याला हवी असेल तो तुमच्याशी तुमच्याकडून मिळविण्यासाठी फार गोड बोलेल, तुम्ही सांगाल ते करेल. पण जेंव्हा ते परत देण्याची वेळ येईल तेंव्हा तुम्हाला तो टाळेल, क्वचीत प्रसंगी भांडायलाही लागेल. मनुष्याची  ही प्रवृत्ती फार चुकीची आहे , तुम्हाला काय वाटते ???????????







Friday 11 March 2011

मन : जन्माचो सोबती

नमस्कार मित्रहो !!!
मी लिंगूराम .

आजपासून मी आपल्या भेटीला येणार आहे .
मला माझे विचार लिहायला आणि आपले विचार वाचायला फार आवडतील .
कथा लिंगूरामाची , याद्वारे मी लिंगूरामचा जीवन प्रवास वर्णन करणार आहे .
आता तुम्हाला प्रश्न पडेल की हा लिंगूराम कोण ?



तर लिंगूराम हा कुणी प्रसिद्ध व्यक्ति नसून , एक साधेसरळ , तुमच्या आमच्यातले व्यक्तिमत्व आहे .
त्याच्या वाट्याला आलेले जीवन , त्याला पडलेले प्रश्न , हे कदाचित आपल्याही अनुभवास आले असतील .
तेच मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न .
धन्यवाद् !
आपला ,
लिंगूराम .



मित्रहो,

आपण मनापासून कधी मनाचा विचार केलाय.
सगळेच आपले मन मन करीत असतात. पण हे मन काय असते ? ते कोठे असते ? मनाशी आपले नाते काय आहे ? असे आणि अजुनही बरेच मनाविषयी प्रश्न मला बालपणापासूनच सतावतायत तसेच आपल्यालाही सतावतात का ?  मी याच माझ्या मनाबद्दल तुमच्याशी गप्पा मारणार आहे.

तसा माझा आणि मनाचा संबंध बराच लवकर आला. तुमचाही आला असेल.

लहानपणी, म्हणजे जेव्हा थोडं समजायला लागलं तेंव्हापासून आई नंतर माझा सोबती कोण असेल तर ते म्हणजे माझे मन.

लहानपणी तसा मी फार खोडकर होतो. पण हळवाही तेवढाच होतो. आजोळी जन्म झाल्यामुळे आजी-आजोबांकडेच बालपण गेल. आजोळी सगळ्यांच फार प्रेम मिळे. आईपेक्षा आजोबांच प्रेम जास्त त्यामुळे आजोळीच राहणे मी पसंत करी.

अगोदर उल्लेख केल्याप्रमाने मी खोडकर असल्यामुळे वाडीतल्या भटाच्या मुलाची मी खोड काढली. त्याने माझी तक्रार आजोबांजवळ केली. आजोबा तेंव्हा माझ्यावर फार रागावले. माझा पापा घेतला नाही, मला रात्री झोपताना गोष्ट सांगीतली नाही तसेच सकाळी माझ्याशी न बोलताच गुरे घेऊन शेतावर गेले. ही गोष्ट त्यावेळी मला म्हणजे माझ्या मनाला फार लागली. मी फार बेचैन झालो. तेंव्हा मी बालवाडीत जात असे. पण आजोबा माझ्याशी बोलत नाहीत या विचाराने मी शाळेतही गेलो नाही. आजोबांची न्याहरीला येण्याची वाट पहात राहीलो.  कधी त्यांच्या मांडीवर बसुन त्यांच्या पीकलेल्या बारीक दाढी असलेल्या गालावर गाल फीरवतो असे झाले होते.

आजोबा दुपारी शेतातून आले. मी त्यांची वाटच पहात होतो. त्यांना पाहून फार आनंद झाला. मी धावतच त्यांच्याकडे गेलो.

मला पाहून त्यांनी आजीला विचारले, "काय गो आज पपलो शाळेत नाय गेलो ? "
आजी म्हणाली, " तुम्ही तेचो मुको घेवक नाय, रात्री गोष्ट सांगाक नाय आणि सकाळी रोजसारख्या उठउक नाय ह्येचा त्येका वायट वाटला म्हणुन शाळेत जावक नाय. तुमची वाट बघीत रवलो हा ."


आजोबांनी हातपाय धुतले आणि मला मांडीवर घेउन खोड्या नको करु म्हणुन सांगीतले. माझा गोड पापा घेतला . मला फार आनंद झाला.

खरे तर मी त्या भटाच्या मुलाची पाटी फोडली होती. तेव्हा दगडाच्या पाट्या असत. माझ्यामुळे आजोबांना भटाचे बोलणे खावे लागले होते. कारण आजोबा माझे लाड करायचे आणि त्यांच्यामुळेच मी एवढा शेफारलो असे त्यांना म्हणाले.

आजोबांनी मला न मारता , माझ्या शरीराला शिक्षा नकरता माझ्याशी न बोलून माझ्या मनाला चांगली शिक्षा केली. आजीने, मामाने मला तेव्हा फार मारले पण त्याचे मला काहीच वाटले नव्हते, पण आजोबा माझ्याशी बोलले नाहीत याचे त्या बालमनाला फार वाईट वाटले.

आणी तेंव्हाच मला मन काय असते त्याची जाणीव झाली.

त्या दिवसापासून आजतगत हे मन माझे पक्के मित्र बनले आहे. कारण तेव्हा आजोबा माझ्याशी बोलले नाहीत याचा विचार करीत होतो आणि बोलत होतो , कुणाशी तर मनाशी !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

जणू तेव्हापासून मी आणि मन एकदम हाडाचे सोबती बनलोय.

माझेच नाही या जगात जन्माला आलेल्या प्रत्येकाला एक मन असते आणि तेच शेवटपर्यंत त्याचे ते सखा, सोबती, मार्गदर्शक, गुरु आणि बरंच काही बनून राहतं.

या गोष्टीवर कुणाचाच विश्वास बसणार नाही, पण जीवनात घडणा-या प्रत्येक गोष्टीचा आपल्या त्या वेळेच्या वागण्याचा विचार केला तर हे लक्षात येईल की मनाचा आपल्या वागण्याशी कीती जवळचा संबंध होता ते.

कारण म्हणतात ना की "मन करा रे प्रसन्न, सर्व सिध्दीचे कारण ।।"

कारण या जगात मानव कींवा ईतर प्राणी जे काही वर्तन करतात त्यात मनाचा संबंध असतोच.

खरं की नाही थोडा विचार करा , मन आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा, एकदा तुम्ही मनावर विजय मिळवलात की हे जीवन तुमचंच आहे.........................


*** लिंगूराम शापित